तिळगुळ म्हंटलं की मला आठवते  ती लीलावती भागवतांची कविता 


कणभर तीळाची मणभर करामत


वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा

उडत चालले टणाटणा !

वाटेत भेटला तिळाचा कण

हसायला लागले तिघेही जण !


तीळ चालला भरभर,

थांबत नाही कुठे पळभर !

"तिळा, तिळा, कसली रे गडबड ? "

"थांबायला वेळ नाही,

सांगायला वेळ नाही.

काम आहे मोठं, मला नाही सवड ! "

"ऐक तर जरा, पहा तर खरा,

कणभर तिळाचा मणभर नखरा ! "


"बघा तरी थाट ! सोडा माझी वाट ! "

"बघू या गंमत, करू या जंमत !

चला रे जाऊ यांच्याबरोबर."

तीळ चालला भरभर, वाटेत लागले ताईचे घर.

तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.

ताईच्या हातात रिकामी परात

हलवा करायला तीळ नाही घरात !

ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,

"घाल मला पाकात, हलवा कर झोकात."

ताईने टाकला तीळ परातीत,

चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,

इकडून तिकडे बसली हालवीत.

शेगडी पेटली रसरसून,

वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा गेले घाबरुन !


पण तीळ पाहा कसा ?

हाय नाही, हुय नाही, हासे फसफसा !

पाकाने खुलतोय, काट्याने फुलतोय !

अरे, पण हे काय ? तीळ कुठे गेला ?

काटेरी, पांढरा हलवा कुठून आला ?

"वाटण्या फुटाण्या, शेंगदाण्या,

पाहिलीत गंमत ? कणभर तिळाची मणभर करामत !

एवढासा म्हणून हसलात मला,

खुलवीन मी तर सर्व जगाला !"


— लीलावती भागवत

https://balbharatikavita.blogspot.com/2015/01/blog-post_16.html

तीळगुळ घ्या, गोड बोला! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Comments

Popular posts from this blog